Tuesday, March 13, 2012

विद्याची ‘कहानी’

कोलकाता शहर आणि बांगला संस्कृतीविषयी विद्या बालनला खास प्रेम आहे. आगामी चित्रपट ‘कहानी’च्या निमित्ताने तिला या शहरात हिंडण्या-फिरण्याची संधी मिळाली. या चित्रपटात कोलकाता शहराचे वास्तव समर्पकतेने मांडण्यात आले आहे.
विद्या बागची लंडनहून कोलकाता शहरात येते. ती गरोदर आहे. उत्सवप्रिय असलेल्या या शहरात ती एकटी आहे. कारण, तिचा नवरा तिला सोडून गेला आहे. आपल्या नवर्‍याला शोधण्यासाठी ती या शहरात आली आहे. ज्या पुराव्याच्या आधारे नवर्‍याला शोधण्यासाठी ती कोलकात्यात येते, ते सारे पुरावे व्यर्थ ठरतात. तिच्यासमोर नवर्‍याला कसे शोधावे, असा मोठा प्रश्‍न आहे. तरीही ती नवर्‍याला शोधण्याचा जीवापाड प्रयत्न करीतच असते. या दरम्यान सर्वजण तिला समजावून सांगतात की, ती ज्या नवर्‍याला शोधत आहे, त्याचे कोणतेही अस्तित्व नाही. मात्र ती आपल्या मतावर ठाम असते. नंतर तिला कळून  चुकते की, आपल्याला जे काही  दाखवले जात आहे, सांगितले जात आहे, ते असत्य आहे. नवरा आपल्यापासून दूर राहावा म्हणूनच कोणीतरी योजनापूर्वक हे सारे करीत आहे. मग ती आपला जीव धोक्यात घालून नवर्‍याचा शोध घेऊ लागते. कारण तिला आपल्या पोटातील मुलाची भेट त्याच्या वडिलाशी करून द्यायची असते.
या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत  सुजॉय घोष. २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बीट्‌स’ नामक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता. त्या चित्रपटाची चांगलीच प्रशंसा झाली होती. मात्र त्यांचा २००५ साली प्रदर्शित झालेला दुसरा चित्रपट ‘होम डिलेव्हरी’ साफ आपटला. यानंतर त्यांनी बिगबजेट ‘अलादीन’ हा चित्रपट केला. यात अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिझ व संजय दत्त यासारखे कलाकार होते. तरीही तो चित्रपट फ्लॉप  ठरला. सुजॉय घोष प्रतिभावान दिग्दर्शक आहेत, यात वाद नाही. पण त्यांना एका यशाची गरज आहे. ही गरज ‘कहानी’ हा चित्रपट पूर्ण करेल, अशी अपेक्षा आहे.
पेन इंडिया प्रा. लि., वायकॉम १८ मोशन पिक्चर्स, बाउंडस्क्रिप्ट मोशन पिक्चर्स प्रा. लि. बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे निर्माते  सुजॉय  घोष व कुशल गाडा आहेत. संगीत दिले आहे विशाल शेखर यांनी. या चित्रपटात  विद्या बालनसह परमब्रत चट्टोपाध्याय, नवाजुद्दीन सिद्दकी यांच्याही भूमिका आहेत.
तरुण भारत, सदाफुली. ७ मार्च २०१२ 

No comments:

Post a Comment