Monday, October 3, 2011

बापूंच्या पुतळ्यासमोर सरकारला सुबुद्धी देण्याची प्रार्थना

मुंबई, -
गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न एक महिन्यात सोडविण्याचे आश्वासन देऊन दोन महिने झाले तरी अद्याप कोणतीच हालचाल न करणाऱ्या सरकारला सुबुद्धी द्या, अशी प्रार्थना आज सुमारे दोन हजार गिरणी कामगारांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येऊन केली. येत्या मंगळवारी सरकारने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत गिरणी कामगारांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याची सुबुद्धी विरोधी पक्षीयांनादेखील व्हावी, असे साकडेही या कामगारांनी महात्माजींना घातले. गिरणी कामगारांच्या घरांच्या रेंगाळलेल्या प्रश्नावर मंगळवारच्या बैठकीत काय तोडगा निघतो, याकडे आता हजारो गिरणी कामगारांचे लक्ष लागले आहे.
कामगारांना घरे देण्याच्या मागणीवरून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गाजले. गिरणी कामगारांच्या मोर्चास शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपचे विनोद तावडे, रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले आदी नेत्यांनी शक्तिनिशी जोरदार पाठिंबा दिला होता. नंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक महिन्यांत हा प्रश्न सोडविण्याचे जाहीर केले. मात्र, पात्रतेचे निकष, घरांची संख्या, किंमत आदी मुद्दय़ावर अद्यापही कोणताच निर्णय न झाल्याने अखेर आज गिरणी कामगार पुन्हा रस्त्यावर आले. या प्रश्नावर येत्या  मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यासंबंधीचे पत्र सरकारतर्फे गिरणी कामगारांच्या संबंधित नेत्यांना अगोदरच पाठविण्यात आल्याने, सरकारविरोधी निदर्शनांऐवजी, प्रार्थना मेळावा आयोजित करून ‘गांधीगिरी’चा मार्ग आज गिरणी कामगारांनी अवलंबिला. त्याआधी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या कामगारांची भेट घेऊन कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.
आता येत्या मंगळवारच्या बैठकीत विरोधी पक्ष या मुद्दय़ावर कोणती भूमिका घेतात, यावर या प्रश्नाते भवितव्य अवलंबून असल्याचे कामगार नेत्यांचे मत आहे. सभा-मोर्चासमोर घोषणा देणे वेगळे, आणि सरकारला निर्णय घेण्यास भाग भाग पाडणारी भूमिका घेणे वेगळे, त्यामुळे, मंगळवारी विरोधी पक्षांची भूमिका मंगळवारी अधिक निर्णायक ठरेल, असे मत गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment